वर्धा नदी पुलावर कचऱ्याचे साम्राज्य, सबंधित विभागाचे सपशेल दुर्लक्ष

राजुरा, ३० सप्टें. :- वर्धा नदीचा पूर ओसरला. मात्र पुलावर मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाल्याने वाहतूक ठप्प पडली आहे. याकडे राजुरा व गोंडपिपरी तालुक्याच्या सबंधित विभागाचे सपशेल दुर्लक्ष असल्याने परिसरातील नागरिकांना ये जा करण्यास तारेवरची कसरत करावी लागत आहे.
वर्धा नदी पुलावरील आलेल्या पुराचे पाणी ओसरले. सकाळ पासून पुल ये – जा करण्यास मोकळा झाला. मात्र नदी पुलावर पुराने वाहून आलेल्या कचऱ्याचा मोठा संचय झाल्याने वाहतूक ठप्प पडली आहे. याठिकाणी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक गाय मृत अवस्थेत अडकून पडल्याने व पुराच्या प्रवाहात आलेल्या कचऱ्याची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी झाली आहे.
दोन तालुक्यांना जोडणारा महत्वाचा मार्ग म्हणजे वर्धा नदी पुल. मात्र पुलावर दोन ते तीन फूट कचरा अडकून पडल्याने वाहतुकीकरिता मोठी अडचण निर्माण झाली आहे. सबंधित विभागाने घेतलेले कुंभकर्णी झोपेचे सोंग दोन्ही तालुक्यातील नागरिकांना मोठी डोकेदुखी ठरत असून मोठ्या नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रवाशांना होत असलेल्या त्रासाचे भान मात्र सबंधित कर्तव्य कसूर विभागाला नाही, हि मोठी शोकातींका आहे. लवकरात लवकर वर्धा नदी पुल वाहतुकीस खुला करावा अशी मागणी जनतेने केली आहे.








