विरुर स्टेशन रेल्वे गेट एक आठवडा बंद ; वाहतुकीस नाहक अडथळा
पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
विरूर स्टे./राजुरा :- १३ नोव्हेंबर पासुन २० नोव्हेंबर पर्यंत विरुर स्टेशन रेल्वे गेट रेल्वे पटरीच्या कामामुळे सात दिवस बंद असल्यामुळे विरुर गावाशी जोडलेल्या २० गावाचा व गोंडपिपरी तालुक्यातील तसेच तेलंगणा सिरपुर कडे ये – जा करणारा रहदारीचा मार्ग बंद असल्यामुळे स्थानिक तसेच परीसरातील नागरीकाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच स्थानिक शेतकऱ्यांना आपल्या शेतात बैलबंडीने शेतीशी निगडीत साहित्य, कापुस इत्यादी कामासाठी वाहतुक करणे अवघड झाले आहे.
विरूर स्टेशन येथील बाजारपेठ आजू बाजूच्या २० ते २२ गावाशी निगडित असून येथील नागरिकांना मोठ्या नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. येथे पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, वनपरिक्षेत्र कार्यालय, रुग्णालय तसेच आठवडी बाजार व दैंनदिन गरजेच्या वस्तू तसेच कृषी साहित्य खरेदीची बाजारपेठ आहे. मात्र रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कार्यप्रणाली मुळे सातत्याने दोन तीन महिन्याला एक – एक आठवडा सदर रेल्वे बंद असतो. यामुळे सदर मार्गाने तालुक्याच्या ठिकाणी शाळा, कॉलेज ला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचेही अपरिमित शैक्षणिक नुकसान होत आहे.
असे काम रेल्वे प्रशासन दर दोन तिन महिण्यानी करत असते. हा सततचा त्रास असल्यामुळे ग्रामस्थाना व शेतकऱ्यांना पर्यायी सोयीचा मार्ग रेल्वे प्रशासन द्वारे करुन देणे गरजेचे होते, पण याकडे रेल्वे प्रशासन कानाडोळा करुन आपले काम करत असते. स्थानिक जनप्रतीनिधी, आमदार व खासदार यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा प्रश्न सोडवतील अशी ग्रामस्थाची अपेक्षा आहे.
“विरुर परीसरातील शेतकऱ्यांना व ग्रामस्थाना निरंतर पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देण्यात यावा. अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग निवडावा लागेल.” – सचिन पिपरे, सामाजिक कार्यकर्ता व शेतकरी








