सम्यक बुद्ध विहारात वर्षावास समारोप सोहळा संपन्न — जेष्ठ उपासिकांचा सन्मान

राजुरा (ता.प्र.) :सोमनाथपूर वॉर्ड येथील सम्यक बुद्ध विहारात दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी वर्षावास समारोप सोहळा अत्यंत श्रद्धा आणि उत्साहात पार पडला. या प्रसंगी पूज्य भदंत भारद्वाज (तेलंगणा) यांच्या प्रेरणादायी धम्म देशनाने कार्यक्रमाला मंगल प्रारंभ झाला.
वर्षावासाचे महत्व:
भगवान गौतम बुद्धांच्या काळापासून सुरू असलेली वर्षावास ही परंपरा संघजीवनातील अत्यंत महत्त्वाची साधना मानली जाते. पावसाळ्याच्या तीन महिन्यांच्या काळात भिक्खू संघ एका स्थळी राहून ध्यान, साधना आणि धम्म देशना करून जनमानसात धम्माचा प्रसार करतात. या काळात गृहस्थ उपासक व उपासिका सुद्धा विहारात नियमित उपस्थित राहून आपले जीवन धम्ममय करण्याचा प्रयत्न करतात.
या पार्श्वभूमीवर, सम्यक बुद्ध विहारात गेल्या तीन महिन्यांपासून वर्षावास नियमित सुरू होता. या काळात दररोज विहारात उपस्थित राहून धम्मसेवा करणाऱ्या जेष्ठ धम्म उपासिकांचा सन्मान समारंभात करण्यात आला.
त्यात आयु. नी. अंजनाबाई करमणकर, कुसुमबाई कातकर, चंद्रकलाबाई ब्राम्हणे आणि झाडे काकू यांचा पुष्पगुच्छ देऊन तसेच धम्मध्वजाचा दुपट्टा खांद्यावर घालून सन्मान करण्यात आला.
यानंतर सर्व उपस्थितांनी सरनेतय घेऊन वर्षावास समारोपाचा समारंभ संपन्न केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद निमसरकार यांनी केले, तर फळदान आयु. अमोलजी राऊत यांनी केले.
कार्यक्रमास आयु. धम्मसेवक गौतमजी देवगडे, तसेच सर्व धम्म उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमात श्रद्धा, कृतज्ञता आणि धम्मभावनेचा सुंदर संगम पाहायला मिळाला.






