रावण दहनावर बंदी ; भ्रष्टाचार-आतंकवादाचे प्रतीकात्मक दहन
राजुरा (ता.प्र.) : राजुर्यात यंदाच्या विजयादशमीला मोठा बदल पाहायला मिळणार आहे. आदिवासी व बहुजन समाजाच्या संघटनांनी दिलेल्या तीव्र विरोधानंतर पारंपरिक रावण दहन ऐवजी भ्रष्टाचार, दहशतवाद, आतंकवाद आणि वाईट प्रथा यांच्या प्रतीकात्मक दहनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
आदिवासी संघटनांचे म्हणणे आहे की, “दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करण्याची कुठलीही ऐतिहासिक परंपरा नाही. मनुवादी विचारसरणीने लादलेली ही प्रथा महात्मा रावण यांचा अपमान करणारी आहे. त्यामुळे बहुजन समाजाच्या भावना वारंवार दुखावल्या जातात.”
या पार्श्वभूमीवर विविध आदिवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी राजुरा पोलीस ठाण्यात पोलिस निरीक्षक सुमित परतेकी यांची भेट घेतली. संघटनांनी आपली भूमिका मांडत रावण दहनास ठाम विरोध दर्शविला.
त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने भवानी माता देवस्थान समिती आणि आदिवासी संघटनांची संयुक्त बैठक घेण्यात आली. चर्चेनंतर दोन्ही बाजूंनी समन्वयाचा मार्ग स्वीकारत रावण दहन बंद करण्यास संमती दिली. त्याऐवजी समाजातील भ्रष्टाचार, दहशतवाद, आतंकवाद व वाईट प्रथांचे दहन करण्याचे ठरले.
“आदिवासी समाजाच्या भावना लक्षात घेऊन यावर्षी रावण दहन होणार नाही. त्याऐवजी भ्रष्टाचार, दहशतवाद, आतंकवाद आणि वाईट प्रथांचे दहन करण्याचा निर्णय घेतला आहे.” – चव्हाण मामा, व्यवस्थापक, भवानी माता देवस्थान समिती








