ठिय्या आंदोलन कर्त्यांचा अट्ठेचाळीसावा दिवस, वनविभाग प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष
प्रशासन या आंदोलनाची दखल घेईल काय..? राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोली यांचा गहन प्रश्न
✍️सुखसागर झाडे
गडचिरोली, 5 ऑगस्ट
गडचिरोली येथील मुख्य वनसंरक्षक यांच्या कार्यालयासमोर गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते शंकर ढोलगे, श्रीकृष्ण वाघाडे, रवी सेलोटे गेल्या 48 दिवसापासून अविरत ठिय्या आंदोलन करीत आहेत. प्रामुख्याने आंदोलन करताना दिलेल्या माहितीनुसार वनविभागाने नियम धाब्यावर बसवून एका अवैध गौण खनिज उत्तखन करणारया कंपनीवर कारवाई केली नाही म्हणून व या कंपनीवर विशेष मेहरबान वनविभागातील काही कर्मचारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अन्य अवैध उत्खनन व काही भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर तसेच वनविभागातील काही अधिकारी कर्मचारी यांच्या निलंबनाच्या विषयावर गेल्या 48 दिवसापासून मुख्य वनसंरक्षक कार्यालय यांच्या समोर सदर आंदोलनकर्ते लोकशाहीच्या मार्गाने कारवाई न झाल्याने न्याय मिळवून घेण्यासाठी ठिय्या आंदोलन करीत आहेत. परंतु आज पर्यंत कोणतेही वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी अथवा वरिष्ठ वन अधिकारी यांनी या ठिय्या आंदोलनकर्त्यांची साधी विचारपूस सुद्धा केली नाही. आंदोलन कर्त्यांनी या विषयावर वारंवार सविस्तर माहिती व आवश्यक पुरावे सुद्धा सादर केलेले आहे. परंतु काहीच उपयोग झाला नाही. दखल घेईपर्यंत या विषयावर यांचे आंदोलन अविरत सुरू राहणार आहे.
आज या आंदोलनाला राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी व प्रकाश थुल यांनी सदिच्छा भेट दिली व सविस्तर माहिती जाणून घेतली. आंदोलन मंडपातूनच मुख्य वनसंरक्षक यांना संघटनेचे अध्यक्ष यांनी भ्रमणध्वनी वर या विषयावर विचारणा केली तेव्हा त्यांनी दोन दिवसात या आंदोलनकर्त्यांचा आपण तोडगा काढू असे आश्वासन दिले.
त्यानंतर त्याच उपोषण मंडपातून उपवनसंरक्षक वडसा यांना सुद्धा माहिती देण्यासाठी भ्रमणध्वनी करण्यात आला परंतु त्यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही. या विषयावर राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने नाराजी व्यक्त केलेली असून गेल्या 48 दिवसापासून मुख्य वनसंरक्षक कार्यालय गडचिरोली यांच्या समोर लोकशाही मार्गाने या आंदोलन करणाऱ्या आंदोलन कर्त्यांना वनविभागाने न्याय द्यावा. अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोली यांनी केली आहे.









