गोंडपिपरी पोलिसांची धडक कारवाई ; पाच पिकअप सह दोघे ताब्यात, ४६ गोवंशीय जनावरांची सुटका
गोंडपिपरी, २१ फेब्रु. :- गेल्या कित्येक महिन्यापासून गोवंशीय जानवर तस्करांच्या जाळे बरेच सक्रिय झालेले दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर गोंडपिंपरी पोलीस प्रशासनाने सातत्याने जानवर तस्करांच्या मुसक्या आवळत कारवाया केल्या आहेत. अशीच एक मोठी कारवाई आज गोंडपिपरी पोलिसांनी पुन्हा केली असून ५ पिक-अप वाहने जप्त व ४६ गोवंशीय गायी व बैलांची सुटका केली आहे. असा एकूण ५० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
गडचिरोली येथून तेलंगणा राज्यात निर्दयतेने कत्तलीसाठी गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या मिळालेल्या माहितीच्या आधारे वढोली येथे नाकाबंदी करण्यात आली. या नाकाबंदीत सदरील कारवाई करण्यात आली. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत तेलंगणातील आसिफाबाद जिल्ह्यातील वाकडी येथील मोहसीन अयुब खान (वय ४०), मोहम्मद मंजूर अली (वय ४२) या दोघांसह पाच पिकअप वाहने ताब्यात घेतली. ९ लक्ष २० हजार रुपये किंमतीची ४६ गोवांशिय जनावरे व ४१ लक्ष रूपयांची पाच पिकअप वाहने जप्त करण्यात आली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मुल सत्यजित आमले यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार रमेश हत्तीगोटे, पोलीस हवालदार विलास कोवे, वंदिराम पाल, अनुप कवठेकर, पोलीस अंमलदार अतुल तोडासे, तिरुपती गोडसेलवार, प्रवीण कडूकर, प्रशांत नैताम, सुनील गव्हारे चालक पुनेश्वर कुळमेथे, मनिषा ठाकरे, सैनिक रियाज शेख, प्रशांत गुडपल्ले यांनी पार पाडली.
गेल्या कित्येक महिन्यांपासून कोठारी, लाठी व विरुर स्टेशन पोलीस ठाणे हद्दीतून सर्रासपणे निर्दयतेने चारचाकी वाहनात कोंबून गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक सुरू असताना सदर ठाणे हद्दीत एकही कारवाई होताना दिसून येत नसल्याने पोलिसांची भूमिका संशयास्पद दिसून येत आहे.








