शेतकरी जन आंदोलन समिती वतीने भेंडाळा येथे शेतकरी हक्क परिषदेचे आयोजन
भेंडाळा (चामोर्शी), सुखसागर झाडे
शेतकरी जन आंदोलन समितीच्या वतीने भेंडाळा येथे आयोजित शेतकरी परिषदेत घेण्यात आली. या परिषदेत गडचिरोली विधानसभेचे लोकप्रिय आमदार मिलिंदजी नरोटे यांनी परिषदेत संबोधित केले. तसेच व्यासपीठावर विराजमान मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करताना शेतकरी बंधु- भगिनींशी संवाद साधला.
या प्रसंगी मंचावर उपस्थित आमचे मार्गदर्शक माजी आमदार अँड. वामनजी चपट, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, अधिवक्ता उच्च न्यायालय नागपूर ॲड. विजय मोरांडे, अरुण मुनघाटे, शरद ब्राह्मणवाडे, रुपेश निमसकार, भेंडाळा चे प्रथम नागरिक सरपंच जुवारे आणि सर्व मान्यवरांनी जमिनीच्या प्रश्नावर अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.
एक लोकप्रतिनिधी म्हणूनचं नाही, तर एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आमदार नरोटे यांनी बोलताना मी आज या व्यासपीठावरून तुम्हाला ग्वाही देतो की, तुमची जमीन ही तुमची मालमत्ता आहे आणि त्यावर निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार फक्त तुमचाच आहे.
पिढ्यान-पिढ्या तुम्ही ज्या जमिनीची मशागत केली, ज्यावर तुमची मुलं शिकून मोठी झाली, ती जमीन तुमच्या संमतीशिवाय कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.
जोपर्यंत तुम्ही संमती देत नाही तोपर्यंत तुमच्या जमिनीचा एक इंच तुकडाही जाऊ देणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे.
जिल्हाधिकारी आणि कंपनीच्या प्रतिनिधींसोबत होणाऱ्या प्रत्येक चर्चेत तुमचा मुलगा म्हणून तुमच्या बाजूने खंबीरपणे उभा राहील. हा लढा केवळ वैयक्तिक नसून तो आपल्या संपूर्ण परिसराचा सामूहिक लढा आहे.
तुम्ही संघटित होऊन आपल्या हक्कासाठी लढायला शिका, तुमच्या या लढ्यात मी शेवटपर्यंत तुमच्या सोबत आहे. वेळ पडल्यास तुमच्या मागण्या घेऊन आपण माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांकडे जाऊ, पण शेतकऱ्यांवर कोणतीही जबरदस्ती खपवून घेतली जाणार नाही.
तुम्ही दिलेल्या मताचा आणि विश्वासाचा मान राखत, तुमच्या पाठीशी मी ढाल बनून उभा आहे याची खात्री बाळगा.
अशी ग्वाही आपलं मनोगत व्यक्त करताना आमदार मिलिंदजी नरोटे यांनी उपस्थित शेतकरी बांधवाना दिली.









