छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राजुरा तालुक्यात आंदोलन.
राजुरा: छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असून, त्यांच्या नावावर महाराष्ट्रात अनेकदा सत्ता स्थापन झाली आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट मालवण येथे उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एकाएकी कोसळून पडल्याने महाराष्ट्राच्या अस्मितेला डाग लागल्याची भावना व्यक्त करून राजुरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.
राजुरा तालुक्यातील तहसील कार्यालयाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर तालुका अध्यक्ष आसिफ सय्यद यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या भ्रष्टाचारी सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात महायुतीच्या काळे कारणामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी घोषणाबाजी करत दोषी असलेल्या शिल्पकार, कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
आसिफ सय्यद यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यांपूर्वीच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला होता, तरीही या पुतळ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून आवश्यक ती काळजी न घेता हे बांधकाम करण्यात आले आहे, असे आरोप केले. त्यांनी पुढे सांगितले की, या घटनेतील दोषींवर तत्काळ कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.
या आंदोलनात तालुकाध्यक्ष आसिफ सय्यद यांच्यासोबत शहर अध्यक्ष राजू ददगाड़, युवक शहर अध्यक्ष स्वप्निल बाजूजवार, अल्पसंख्यक तालुकाध्यक्ष रमीज बेग, युवक तालुकाध्यक्ष प्रणय धोटे, तालुका उपाध्यक्ष तुषार येमूलवार, मुनावर शेख, अरबाझ शेख, कुणाल घूबे, नरसिंह नुकाला आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला घाव लागला असून, या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.