Home चंद्रपूर ६ महिन्यांपासून धान्य बंद!

६ महिन्यांपासून धान्य बंद!

0
28

६ महिन्यांपासून धान्य बंद!

कोरपना तहसीलमध्ये अन्नपुरवठा घोटाळ्याचा स्फोट

“नितीन बावणे” यांच्या नेतृत्वाखाली संतप्त महिलांचा उठाव

कोरपना (प्रतिनिधी) :- कोरपना तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागातील मनमानी कारभार अखेर उघडकीस आला असून, तब्बल ६ महिन्यांपासून गरीब महिलांचे स्वस्त धान्य बंद करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणामुळे परिसरात तीव्र संताप उसळला आहे. या अन्यायाविरोधात नगरसेवक नितीन बावणे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त महिलांनी तहसील कार्यालयावर उठाव पुकारत या प्रकरणाला जोरदार वाचा फोडली.

निरीक्षण अधिकारी विक्की देवघरे यांच्या कारभारावर गंभीर आरोप होत असून, कोणतेही स्पष्ट कारण न देता अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, अंगणवाडी मदतनीस तसेच काही गरीब महिलांचे अन्नधान्य अचानक बंद करण्यात आले आहे. महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्न पुरवठा विभाग (कंट्रोल) तर्फे मिळणारे नियमित धान्य कोणतीही पूर्वसूचना न देता थांबविण्यात आले.

या संदर्भात महिलांनी विचारणा केली असता संबंधित अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली, इतकेच नव्हे तर काही महिलांशी अश्लील भाषेत वर्तन केल्याचेही गंभीर आरोप समोर आले आहेत. “हे मी केले नाही, तहसीलदार मॅडमना विचारा” असे सांगत अधिकारी जबाबदारी झटकत असल्याने प्रशासनातील समन्वयाचा अभाव स्पष्ट दिसून येतो.

सर्वात धक्कादायक आरोप म्हणजे – “देवघरे हा अधिकारी अनाज सुरू करून देण्यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मागणी करत आहे,” असा गंभीर आरोप संतप्त महिलांनी केला आहे. काही अशा महिलांचेही धान्य बंद करण्यात आले आहे की त्या ना अंगणवाडी सेविका आहेत, ना आशा वर्कर तरीही त्यांच्या हक्काच्या अन्नधान्यावर गदा आली आहे. त्यामुळे गरीब कुटुंबांवर अन्याय होत असून उपासमारीचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

या ठाम भूमिकेमुळे उपस्थित महिलांचा संताप अधिकच उफाळून आला आणि तहसील कार्यालयात जोरदार आंदोलन करण्यात आले. नागरिकांनी आरोप केला की, कोणतेही कारण न देता धान्य बंद करणे, जबाबदारी टाळणे आणि गरीब कुटुंबांना उपासमारीच्या दारात ढकलणे हा अत्यंत गंभीर प्रकार असून यावर तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे.

सध्या या प्रकरणामुळे कोरपना परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, “गरीबांना न्याय मिळणार का?” हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व नगरसेवक नितीन बावणे व संतप्त महिलांकडून देण्यात आला आहे.

कोरपना शहरातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि अंगणवाडी मदतनीस यांना वेतन नसून फक्त मानधन दिले जाते. त्यामुळे त्यांना मिळणारे स्वस्त धान्य बंद करणे हा सरळ अन्याय आहे. जर अशा निकषांवर धान्य बंद करायचे असेल, तर संपूर्ण तालुका, जिल्हा आणि राज्यातील ज्या नागरिकांना शासकीय मानधन मिळते, अशा सर्वांचेच धान्य बंद करावे अन्यथा हा दुजाभाव थांबवावा :- नितीन बावणे नगरसेवक कोरपना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!