गोरगरिबांचा “आनंदाचा शिधा” गेला तरी कुठे..? रेशनधारकांत प्रचंड नाराजीचा सुर…..
चामोर्शी, सुखसागर झाडे
महाराष्ट्र शासनाने चालू केलेली ‘आनंदाचा शिधा’ हि योजना अचानक गायब झाल्याने यावर्षीच्या सणासुदीला रेशन धारक गोरगरिबांची तारांबळ उडल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
सर्वसामान्य गरीब, मजूर आणि श्रमिक वर्गाच्या आनंदात भर टाकणारी, अत्यंत जनसामान्यांच्या जिव्हाळ्याची शासनाची हि योजना अचानक बंद करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण ग्रामीण भागात निर्माण झाले आहे.
सणासुदीच्या काळात अगदी माफक दरात जीवनावश्यक खाद्य वस्तुचे वितरण रेशन दुकानातून शिधाधारकास अवघ्या १०० रुपयांत एक पुर्ण किट दिली जात होती. त्या किटमध्ये प्रत्येकी प्रती १ किलो साखर, रवा, मैदा, तेल, हरभरा डाळ अशा आवश्यक वस्तू ची भेट दिली जात होती. आनंदाचा शिधा हि योजना सामान्यांच्या हिताची होती. ह्या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात प्रत्येक शिधाधारक कुटुंबात आनंदाची लाट पसरत होती.
या योजनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने ही योजना पुनश्च: राबवावी. अशी मागणी सर्व स्तरातून होत असुन शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा ही अपेक्षा रेशन धारकांकडून व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना जनसामान्य नागरिकांकरिता अनेक योजना सुरू करण्यात आल्या होत्या. त्यातीलच “आनंदाचा शिधा” हि एक योजना होती. मात्र सत्तांतर झाल्यानंतर या योजनेला पूर्णविराम देण्यात आला आहे. यामुळे केवळ निवडणुकीपूरते गाजर दाखवण्यात आले होते का? असा सवाल विरोधकांकडून करण्यात येत आहे.








