केंद्रप्रमुख परीक्षेत पात्र उमेदवारांना नियुक्ती केंव्हा? उमेदवार मात्र प्रतीक्षेत…
2430 पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्या ; नव्या शैक्षणिक वर्षापूर्वी नियुक्तीची मागणी
राज्य सरकारकडे शिफारस करण्यासाठी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांना जिल्हा कृती समिती मार्फत दिले निवेदन
गडचिरोली, सुखसागर झाडे :-केंद्र प्रमुख भरती परीक्षेत पात्र ठरलेल्या 2430 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती पत्र देण्यात यावे, यासाठी केंद्र प्रमुख परीक्षा राज्य कोअर कमेटी व जिल्हा कृती समिती गडचिरोली यांच्या वतीने माजी आमदार तथा भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, राज्य सरकारच्या वतीने तसेच आपल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे दिनांक 13 मार्च 2026 रोजी केंद्र प्रमुख भरती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.
या निर्णयाबद्दल शिक्षण मंत्री दादा भुसे व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे अभिनंदन करण्यात आले.
मात्र, निकाल जाहीर होऊनही पात्र उमेदवारांना अद्याप नियुक्ती पत्र मिळालेले नाही.
त्यामुळे उमेदवारांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
नविन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच नियुक्ती पत्र मिळाल्यास संबंधित उमेदवारांना कामकाज समजून घेणे व जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडणे अधिक सुलभ होईल, असा मुद्दा निवेदनात अधोरेखित करण्यात आला आहे.
सर्व 2430 पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, तसेच आपण माजी आमदार व भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी म्हणून आपल्या स्तरावरून याबाबत शिफारस करून पाठपुरावा करावा, अशी समितीच्या वतीने विनंती करण्यात आली.
यावेळी समितीचे प्रदीप भुरसे, जितेंद्र मुसद्दीवार, संदीप एलावार, कपिल सहारे आदी पदाधिकारी व उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.









