राजुरा तहसील कार्यालयात लाचलुचपत तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याची मागणी
◾अमोल राऊत अध्यक्ष नागवंश युथ फोर्स बहुउद्देशीय संस्था, राजुरा यांची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी
राजुरा (प्रतिनिधी) —
राजुरा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना महसूल, प्रमाणपत्र, जमीन नोंदी, शासन योजना आदी कामांसाठी तहसील कार्यालयात वारंवार जावे लागते. या प्रक्रियेत अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत असून काही ठिकाणी लाचलुचपतसदृश प्रकार घडत असल्याच्या तक्रारी जनतेतून वारंवार समोर येत आहेत.
या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय राजुरा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा स्वतंत्र “तक्रार निवारण कक्ष” स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी नागवंश युथ फोर्स बहुउद्देशीय संस्था, राजुरा चे अध्यक्ष अमोल राऊत यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदनाद्वारे केली.
सदर निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मंत्रालय मुंबई यांना प्रतिलिपी स्वरूपात पाठवण्यात आले आहे.
अमोल राऊत यांनी सांगितले की, “राजुरा तहसील कार्यालय हे जनतेच्या दैनंदिन व्यवहाराशी निगडीत अत्यंत महत्त्वाचे शासकीय केंद्र आहे. येथे नागरिकांसाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन झाल्यास लाचलुचपतसदृश प्रकारांवर नियंत्रण येईल, तसेच प्रशासनावरील जनतेचा विश्वास दृढ होईल.”
त्यांनी पुढे म्हटले की, “या कक्षामध्ये नागरिकांना थेट तक्रारी सादर करण्याची सुविधा असावी आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी वेळोवेळी भेट देऊन तपास कार्यवाही करावी. यामुळे प्रशासनातील पारदर्शकता वाढेल व भ्रष्टाचारावर प्रभावी नियंत्रण ठेवता येईल.”
या निवेदनावेळी धनराज उमरे, सुरेंद्र फूसाटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या मागणीचे तालुक्यात सर्वत्र स्वागत होत असून, नागरिकांनी शासनाने या संदर्भात तातडीने कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.








